
UNHA ANI PAUS BY GANGADHAR GADGIL
१९४६-४७ पासून 'नवकथालेखक' हे आपल्या नावामागे लागलेलं विशेषण गंगाधर गाडगीळ आजतागायत टिकवून आहेत. १९४० पासून ते आता त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झालेल्या या त्यांच्या कथासंग्रहापर्यंत गाडगीळांच्या कथालेखनाची चढती कमानच दिसून येते. त्यांच्या लेखनातील टवटवीतपणाही अद्याप अम्लानच राहिलेला आहे. नवथर तारुण्याच्या असोशीने शब्दांवर, कल्पनेवर आणि वास्तव परिस्थितीवर गाडगीळ मनस्वीपणे प्रेम करत होते, हे 'उन्ह आणि पाऊस' या संग्रहावरून स्पष्टपणे दिसून येते. सृजनशील कथालेखनाच्या बाबतीत गाडगीळ कायमच अतृप्त होते. म्हणूनच त्यांच्या कथेच्या वाटचालीत विकास दिसून येतो. आपल्या कथा तटस्थपणे न्याहाळण्याची गाडगीळांना मोठी हौस होती. ही हौस जीवनदर्शनासह कलादर्शनाचीसुद्धा होती. हे त्यांच्या कादंबरी व समीक्षा अशा दोन्ही लेखनांच्या बाबतीत खरे आहे. प्रस्तुतचा नवा कथासंग्रह हा त्यांच्या अखेरच्या काळातील आहे. सतरा कथांचा हा एक सुंदर, सुरस असा घोस आहे. त्यांच्या वयाची, लेखनाची आणि वाङ्मयीन परिपक्व जाणिवांची कल्पना या कथांवरून येते.